कुछ और कविताएं

कालची जख्म

कालची जख्म वेगळीच होती
असे कसे म्हणू मित्रा
वेदनांची आवर्तने सारी एकाच जातीची
कबूल! आजचा वार निसटता आहे
भळभळून रक्त वाहत नाही कालसारखे
पण, आजच्या ह्या निसटत्या वारानेच
कालची जख्म जर्द झाली त्याचे काय?
-डब्ल्यू कपूर

000
वाटेनेच आपला धर्म बदलला

हे मात्र पहिल्यांदाच अनुभवतो आहे
नाही असे नाही
तसे चिमटे ह्या आधीही काढले होते
खरे सांगतो,
पायांना ते कधी झोंबलेच नाहीत
आज असे कसे होत आहे ?
चक्क चटके बसताहेत निखारयांचे
माझ्या आधीही कित्येक गेलेत ना ह्या वाटेने;
मग मलाच का ही जीवघेणी सजा ?
माझे पायच झालेत अधिक संवेदनशील
की वाटेनेच आपला धर्म बदलला ?
-डब्ल्यू कपूर
000
झाड एक प्रतीक

झाडांचे एक बरे असते
त्यांना मुक्याने विस्तारता येते
नि:शब्द सहन करता येतात
वादळवारयाचे उन्मत्त आघात
मला येथल्या मौसमात विस्तारताही येत नाही आणि
त्यांनी दिलेल्या जखमांचा बोभाटाही करता येत नाही
विध्वंसक वादळाच्या मारयाने झाडे वाकतात
भुईसपाट होतात पण
मुळांनी सोसलेल्या आणि पचविलेल्या यातना
त्यांना याची डोळा पाहता येत नाहीत
मी भुईसपाट झालो म्हणजे मला पाहून ते
कुत्सितपणे हसतात आणि
माझ्या पुढयात उभा असतो उद्ध्वस्त स्वप्नांचा काफिला
मुळे धरतात झाडे आणि प्रयत्नांची शिकस्त करून
उभे राहतात तेव्हा
धरणीला त्यांचा हळूवार विकास पाहून
धन्य झाल्यासारखे वाटते
मी मूळ धरून उभे राहण्याचे धाडस करतो तेव्हा
त्यांना माझ्याबद्दल संशय येतो
मी प्रकृतीचा सूर धरून विस्तारण्यासाठी
त्यांना व्यवस्थापकीय कलमा माझा उच्छेद
करण्यासाठी.....!
-धर्मराज निमसरकर
000
ते निसर्गाविषयी बोलतात

ते निसर्गाविषयी बोलतात
ते पर्यावरणाविषयी बोलतात
बोलतात सुंदर, सुरेख पशुपक्षांविषयी
आणि बोलतात आभाळातल्या चंद्रतारयांविषयी

पण ते बोलंत नाहीत
डोंगर दरयाखोरयातल्या आदिवासींबद्दल
ते काय खातात? नि कसे जगतात याबद्दल
त्यांना नाही इंटरेस्ट
कारण ते आहेत ह्या कॉस्मोपॉलिटीन कल्चर मध्ले
हाय-फाय सोसायटीचे मक्तेदार

लक्झरी लाइफ मधून भरल्यापोटी विरंगुळा म्हणून
वा पिकनिक म्हणून ते करतात निसर्गाला जवळ
ते आपल्या तथाकथित अभिरूचीला जोपासत
रमतात प्रायोगिक नाटक वा आर्ट फिल्म मध्ये
पाहतात आर्ट गैलरीत आदिवासींना चितारलेल
जमलंच तर विद्वतेचा आणून सेमिनार मध्ये
वाचतात इंडियन ट्रायबल्स या विषयवर शोध निबंध
देशाला स्वातंत्र्य मिळून पन्नास वर्षे झाली
स्वातंत्र्य म्हणजे काय? हे आजवर न उलगडलेलं कोडं
मिळालेलं स्वातंत्र्य गेलं कुठे?
अजून आदिवासी पाडयात पोहोचलं कसं नाय?

डोगराला लागलेला वणवा त्यांना दिसतो
पण, रानपाखरांच्या पोटात पेटलेला वणवा
ते अनुभवू शकतात काय?
नाहीच, कारण, ते निसर्गाविषयी बोलतात
-बबन लोंढे
000
सभंग

तुकया वाण्याचे
बुडाले दुकान
विकाया मकान, काढले गा

गोरया कुंभाराचा
पेटेचिना आवा
काडी कोणी लावा, बोंबा मारी

सेना नापिताचा
बोथट वस्तरा
कोणी बा निस्तरा, अर्ज करी

सावता माळयाचा
उजाडला मळा
आणीतसे विळा, मानेवरी

चोखा महाराला
मिळे ना बलुतं
संसारी कोली, लागलेले

आणि बडव्याची
तुंदिलशी तनू
दिसे सांड जणू, पोसलेला

-प्रसेनजीत गायकवाड

मातेच्या कविता

-मोहन पाटिल

१:
पाचोळ्याच्या दिसात
पदर ढळेस्तो सावरला, साम्भाळला
भेगाळले, घामेजुन ढेपाळत गाव भटकले
आता कणसात दाणे भरु लागलेत्
अशा वेळी तू कुठ आहेस?

२:
आभाळात मीच चंद्र राखुन ठेवलाय
ओटीत चांदण
सगळी रात उशालगत दिवा जाळुन
आठवणी उजाळल्या
दिवसाउजेडी तरी ये

३:
पिकात उभी राहून पीक झाले
पान हलताना मनोमन हसले
मातीची संगत सुटू ने म्हणून मातीत उतरले
मातीसुध्दा व्हाव वाटलं जीवाला
माझ्यातून तू उभारलास
वाढलास-फुलारलास-फळारलास
तू नाहीस, आता मला
माती व्हावंसं वाटत नाही

४:
सगळी पृथ्वी तुझ्यासाठी
माझ्यासाठी तू

५:
आता सगळं भिजलेलं असतं
पानं सुसाटतात, वारा हेलावतो
मन आतून गंधित, बधिरल्या मातीच्या सुवासानं
गंध उरत नाही
कुशीत तुझे श्वास नसतात

६:
काल फळ तोडताना
नाळेची आठवण जागी झाली
लहान असताना तू 'नारळा'ला
'नाळ 'र म्हणायचास

७:
तुला पेरताना
बाहेर काळोख होता
तुला पेरताना
तुला साठवताना
मी उमलत होते
माझी आण रे
अंधारात मी दिवस मोजीत होते

८:
तुला जन्म दिला
ती खूण
वासनेलगतच गोंदली आहे
भरल्यापोटी सहज म्हणून आठवण झाली
तर नाव घेत जा

९:
पाचोळ्याचं दिवस
भटकंती चालू होती
तुझं रक्त दुपारी पेटायचं
चौकात रक्त रांगोळी ओघळायची
कुठं हमरस्ता स्मशानवाट -
मला समजलं
तुझ्या मुठीतून उधळलेला अहंकार
उग्र होऊन चौकाचौकात गुरगुरायचा
पाखरा, मला हे सहायचं नव्ह्तं
कसं सांगू? रक्त सांडून मिळालेले घास
मला नको आहेत

१०:
तू माझाच, म्हणून मला गोड
तू माझाच, म्हणून मला वेड
तुझ्यात माझं रक्त, म्हणून मला प्रीती
तुझ्यात माझं रक्त्, म्हणून मला भीती
तू माझा, म्हणून माझ्यासारखा हो
तू माझा, म्हणून माझ्यातलं घे
तुझ्यातल्या रक्ताला प्रेमपूर्वक आव्हान
अरे, तुला माझी भीती वाटू दे

११:
मला आठवतो तो हरताळी दिवस
(बहुधा तू त्याच दिवशी गेलास)
तुझ्या खांद्यावर भार देऊन स्तब्ध राहिलेले कामगार
टाळा मिटून गप बसलेला कारखाना
मला आठवतं ...
पोटातल्या आतड्यावर कावळ्यांनी ताव मारून
क्रांतीकारी ढेकर दिली, समानतेच्या नावाखाली
तुला समानता हवी होती
पण अरे, माहित नसलेल्या गावचा रस्ता तरी विचारायचास!
मला आठवतं...
तू वाद खेळायचास
पुराणातल्या तिळाच्या समान वाटणीवर
द्रौपदीवर-

१२:
मला 'एक'च हवं
तू एकदाचा विश्वभरून शांत व्हावास

१३:
ढग अंधारून आले
उभ्या पिकाची नासाडी आरंभली
बुजगावण्यांनी किती थैमान घातलं
तृहा तृहा
मुखात भरवायचा घास मातीआड करावा लागला
श्रम वेचून पसरलेली दौलत सांभाळेस्तो दिशा धुपल्या
पाखरा, मी स्वतः हरवले, भटकले
तुझा शोध हाच ध्यास
तुझ्या हातांनी सावरावास, म्हणून टाहो फोडला
तुझी ओ नाही
तू गाव सोडून मुलुखभर पसरलेला
एक दिवस मी गाव हरवून बसेन्...
तुझ्यासाठी काय व्हावं ते होऊ घालेन...
पायातले काटे मस्तकापर्यंत रुततील...
अरे, कधीतरी भेटून मला 'माझी' म्हणालास
तर...अंगभर सुंदर फुलं उमलतील

१४:
तुझी निर्मिती कशी रे?
आतड्यातलं नाजूक पदर
जुळ्वून जुळवून, हळूवार हळूवार
तळपाय तळहाताइतकेच साजुक, छापील
सुरुवातीला अशी
जसं मस्तक चुंबायला मला पूज्य
तसे पाय कितीदा तरी
आताशा अलीकडे तुझं मस्तक भरकटून
तळपाय भेगाळलेत
किती भिन्न
मी दिलेलं सांभाळता आलं नाही
सांभाळता आलं तर एकच रक्त बिंदू
विषम प्रकाशी पाझरला नसता
अरे, तुझ्या सगळ्याच रक्ताचे घर्मबिंदू व्हावेत
इथल्या मातीत येऊन मिळावेत

१५:
तुला जवळ घ्यावं, न्याहाळावं
ह्रदय भरून गोंजारावं
तू एकदाचा गेलास,नी विश्व अंधारलं
तू येशील तो दिवस सोन्याचा होईल
मग तुझा इतिहास खोदेन, जगभर
सगळ्याच मातीवर

१६:
महिरपीचं तोरणं तोडून
गावपांढरं डोळ्यांआड करून
कूस तुडवून गेलास
ते वेळेपासून
शेंदर्या मारुतीच्या देवळात लामणदिवा पेटल्यावर
गावगाड्याच्या घरांच्या पडवीत
सावल्या कुजबुजतात
आता कसं होईल?

१७:
खळाभर रांगलेले बैल
गळाभर घुंगूरतात
सांजवेळ जवळल्यावर
दाव्याशी विसावतात
तुझी आठवण त्यांच्या पाठीवर थर्थरून उठते
त्यांची आण रे
ते घुंगूर तुझ्या नावाचा जप करतात

१८:
आताशा झोपून असते
डोळे पांगुळलेत, शब्द लडबडतात,
दिवसा स्वप्नं दिसते
काळ्या अंधारातून एक रत्नाळ तारा जवळ येतो
मजजवळ चिमुकली क्षमा मागतो
चेहर्यावर कुणीसं वाकून पाहतं
गावं शहरं जाणवतात
काही कळत नाही
डोळे पांगुळलेत, शब्द लडबडतात,
आताशा झोपून असते

१९:
माझी अंतीम इच्छा : काहीच नाही.
फक्त - मला पडवीत बसवल्यावर
तू येशीत असावास.

शीगवाला

-नारायण सुर्वे


'क्या लिखतो रे पोरा!'
'नाही चाचा - - काही हर्फ जुळवतो.'
म्हणता, म्हणता दाऊदचाचा खोलीत शिरतो
गोंडेवली तुर्की टोपी काढून
गळ्याखालचा घाम पुसून तो 'बीचबंद' पितो
खाली बसतो;
दंडा त्याचा तंगड्या पसरून उताणा होतो.


'एक ध्यानामदी ठेव बेटा!
सबद लिखना बडा सोपा है
सब्दासाठी जीना मुश्कील है.'


देख ये मेरा पाय
साक्षीको तेरी आई काशीबाय
'मी खाटीक आहे बेटा - मगर
गाभणवाली गाय कभी नही काटते.'


तो - सौराज आला; गांधीवाला।
रहम फरमाया अल्ला।
खूप जुलूस मनवला चालवालोने
तेरे बापूने -
तेरा बापू; चालका भोंपू।


हां; तर मी सांगत होता;
एक दिवस मी बसला होता कासाईबाडेपर
बकरा फाडून रख्खा होता सीगपर
इतक्यामंदी समोर झली बोम
मी धावला; देखा -
गर्दीने घेरा था; तुझ्या अम्मीला
काटो बोला
अल्ला हू अकबरवाला
खबरदार; मै बोला
सब हसले, बोले,
ये तो साला निकला पक्का हिंदूवाला


"फिर; काफिरको काटो!"
अल्लाहुवाला आवाज आला
झगडा झाला।
सालोने खूब पिटवला मला
मरते मरते पाय गमवला।
सच की नाय काशिबाय - ?


'तो बेटे -
आता आदमी झाला सस्ता - बकरा म्हाग झाला
जिंदगीमध्ये पोरा, पुरा अंधेर आला,
आनि सब्दाला;
जगवेल असा कोन हाये दिलवाला
सबको पैसेने खा डाला।'

जीर्ण पाचोळा पडे तो उदास

-कुसुमाग्रज


आडवाटेला दूर एक माळ
तरू त्यावरती एकला विशाळ
आणि त्याच्या बिलगूनिया पदास
जीर्ण पाचोळा पडे तो उदास

उषा येवो शिंपित जीवनासी
निशा काळोखी दडवू द्या जगासी
सूर्य गगनातूनी ओतू द्या निखारा
मूक सारे हे साहतो बिचारा

तरूवरची हसतात त्यास पाने
हसे मूठभर ते गवतही मजेने
वाटसरू वाट तुडवीत त्यास जात
परी पाचोळा दिसे नित्य शांत

आणि अंती दिन एक त्या वनांत
येई धावत चौफेर क्षुब्ध वात
दिसे पाचोळा घेरूनी तयाते
नेई उडवुनी त्या दूर दूर कोठे

आणि जागा हो मोकळी तळाशी
पुन्हा पडल्या वरतून पर्ण राशी

मराठी कविता ज्यांना आवड़तात्

About this blog